(भाग -०१)
पिंपरी (Pclive7.com):- ‘पाणी हेचि जीवन’ असं म्हटलं जातं. आणि ते त्रिवार सत्यही आहे. एक वेळ अन्न नाही मिळाले तरी चालेल, पण, पाणी नसेल तर… हा तरच पाण्याचे महत्त्व सांगत असतो. त्यामुळेच गाव असो की शहर पाण्याशिवाय राहू शकत नाही. ते मिळवण्यासाठी वेगवेगळे स्त्रोत शोधले जातात. वेगवेगळे स्रोत निर्माण केले जातात. असाच पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा स्रोत म्हणजे मावळ तालुक्यातील पवना धरण.
पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवण्यासाठी पवना धरण बांधण्यात आले. पण, त्या पवना नदीवर अवलंबून असलेल्या शेतीलाही पाणी मिळावे, यासाठी उपाययोजना करण्यात आली. ती म्हणजे, धरणापासून पिंपरी-चिंचवडपर्यंत नदी पात्रातून पाणी आणले. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या बंधाऱ्यातून ते अशुद्ध पाणी पंपाद्वारे उचलून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तिथे शुद्धीकरण केलेले पाणी शहरात पुरवठा केले जाते.
परंतु, शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त अनेक जण शहरात आले. आजही येत आहेत. लोकसंख्या वाढत आहे. पण, त्याप्रमाणात पाण्याचा स्रोत वाढायला हवा. या विचारातून दहा वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने आंद्रा व भामा-आसखेड धरणातील दररोजचा २६७ एम.एल.डी अर्थात दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर केला. त्यावेळी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी पाण्याचा वाढीव कोटा मिळवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. मात्र, गेल्या दहा वर्षात शहर झपाट्याने विकसित झाले. गृहप्रकल्प पर्यायाने निवासी भाग वाढला. लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, पाणीपुरवठ्याचा स्रोत दहा वर्षांपूर्वीचाच होता. पवना नदीवरील रावेत बंधारा. लोकसंख्या वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढली.
दरम्यानच्या काळात २०१७ मध्ये महानगरपालिकेत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता आली. त्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखले आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी शहरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याअंतर्गत चिखलीत जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळणार आहे. भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर कोटा मंजूर आहे. त्याचेही काम सुरू आहे. जून २०२२ पर्यंत आंद्रा धरणाचे पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तेव्हा आणि आता..
पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता मानांकनानुसार, एका व्यक्तीसाठी दिवसाला १३५ लिटर पाणी कोटा ठरलेला आहे. २००१ मध्ये लोकसंख्या १० लाख सहा हजार ४१७ आणि २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख २७ हजार ६९२ होती. तेव्हा प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५० लिटर पाणी असे नियोजन होते. मात्र, गेल्या दहा वर्षात शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग ७० टक्के राहिला आहे. समाविष्ट गावांमध्ये झपाट्याने बांधकामे होऊन लोकसंख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षात एकट्या चिखलीत दुप्पट लोकसंख्या झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे २०२१ ची जनगणना झाली नाही. मात्र, लोकसंख्या वाढीचा वेग विचारात घेता ३० लाखांवर लोकसंख्या असावी असा अंदाज आहे.
पाणीपुरवठ्याचे स्रोत मात्र वाढलेले नाहीत. त्यामुळे प्रतिमाणशी प्रतिदिन कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. मानांकानुसार १३५ लिटर पाणी निश्चित केले आहे. मात्र, २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हे सर्व दहा वर्षांपूर्वी उपाययोजना न केल्याचे फलित आहे. दहा वर्षांपूर्वीच वाढीव पाणी शहरात आले असते तर आजची स्थिती निर्माण झाली नसती. त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी शहरात आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्यांचे यश दृष्टिक्षेपात असून पुढील काही दिवसांत शहराला जादा पाणी मिळणार आहे.
त्यासह २०१७ पासून महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कारभाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या मदतीने विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यात पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे, अनधिकृत नळजोड अधिकृत करणे. मीटर रिडिंगचे काम करून घेणे, पाण्याचा फेरवापर वाढविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी उद्यानांना देणे, प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीला देऊन शुद्ध पाणी त्यांच्याकडून घेणे, सखल व नवीन भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा करणे, आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी शहरात आणणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
आंद्रा धरण पाणीपुरवठा योजना
आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात कामे सुरू आहेत. आंद्रा पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अशुद्ध जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४३.२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याअंतर्गत धरणापासून देहू पर्यंत नदीतून पाणी आणले जाणार आहे. देहू-निघोजे येथे नदीवर बांध बांधून अशुद्ध जल उपसा केला जाणार आहे. तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम दोन टप्प्यांत सुरू आहे. देहू-निघोजे ते तळवडे चौकापर्यंत लांबी १.८० किलोमीटर आहे. या भागात १२५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तळवडे चौक ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे अंतर ३.८० किलोमीटर आहे. या भागात १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये चिखली पाटीलनगर येथे रस्ता खोदावा लागणार होता. तसेच, तळवडे येथील सिंटेल कंपनी ते अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत विद्युत खांब स्थलांतरित करायचे होते. हे प्रश्न आता सुटले असून काम मार्गी लागले आहे.
भामा-आसखेड योजना
भामा धरण येथे १६७ एमएलडी क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा लागणार आहे. त्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून मंजूर आहे. या जलउपसा केंद्रापासून ८.८ किलोमीटर १७०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीद्वारे जॅकवेलपर्यंत पाणी आणले जाणार आहे. जॅकवेलपासून देहूगाव बंधाऱ्यापर्यंत १८.९ किलोमीटर १४०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र, हे अंतर जास्त असून भामा-आसखेड धरणापासून देहू बंधाऱ्यापर्यंत जलवाहिन्या टाकण्याच्या मार्गातील जमीन पाटबंधारे, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाची असून त्यांची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प
आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. प्रस्तावित ३०० एमएलडीपैकी टप्पा एक अंतर्गत १०० एमएलडी क्षमतेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यांचे स्थापत्य व विद्युत विषयक ८० टक्के कामे झाली आहेत. या प्रकल्पाचा खर्च बांधकामासाठी ४७ कोटी व देखभाल दुरुस्तीसाठी ३२.५५ कोटी रुपये अपेक्षित आहे.