मुंबई (Pclive7.com):- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांनी आपल्या करिअरची सुरुवात ९० च्या दशकात केली होती. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.
अभिनेते अरुण बाली यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली यांनी पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अरुण बाली यांनी आपल्या करिअरमध्ये शाहरुख खानपासून, अक्षय कुमार आणि सुशांत सिंह राजपूतसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. अरुण बाली हे मनोरंजन विश्वातील खूप मोठे आणि प्रसिद्ध नाव होते. ते गेल्या काही काळापासून सतत आजारी होते आणि काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या मुलीने माध्यमांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आपले वडील म्हणजेच अभिनेते अरुण बाली मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त होते. ज्यामध्ये नसा आणि स्नायू यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे ते मागील काही काळापासून सतत आजारी होते. त्यांना काहीवेळा रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.