पिंपरी (Pclive7.com):- जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासनाचा थेट संवादात्मक समन्वय आल्यामुळे तक्रारींचे तात्काळ निराकरण होण्यास जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरली असून लोकसहभागातून नागरिकांचे प्रश्न सुटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवादातून तक्रारीचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे ४९ तक्रारी आणि सूचना नागरिकांकडून प्राप्त झाल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १७, ५, २, ३, १०, ४, ५, ३ नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता तसेच उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. यामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, नदी प्रदुषण विषयक समस्या, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, रस्त्यांमधील तुटलेले चेंबर्स बदलणे व इतर वाहिन्यांची दुरुस्ती करणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे, रस्त्याचे डांबरीकरण करावे, ज्या भागात पाणी साचते तेथील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, दशक्रिया घाटाची दुरुस्ती करावी आदी तक्रारी वजा सूचना आजच्या जनसंवाद सभेमध्ये करण्यात आल्या.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व प्रभागांमध्ये जनसंवाद सभांचे महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी आयोजन करण्यात येते आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या समस्या कमी होण्यास मदत होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.