आज तारखेनुसार साजरा होतोय शिवराज्याभिषेक सोहळा
शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले आणि रयतेला वाली मिळाला. भारताच्या इतिहासातील हा फार मोठा दिवस आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली असल्यामुळे, देशासह विदेशातही आज शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारलं
महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.