शिवसेना पदाधिकाऱ्यांचे भाजपच्या पत्रकबाजीला प्रत्युत्तर
पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत. बारणे यांच्या उमेदवारीच्या विरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी चालवली असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर केला आहे.
पिंपरी दौऱ्यावर रविवारी (दि.१०) आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या सात नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे सांगितले. बारणे यांच्या पराभवास भाजप कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास काम केली आहेत. मतदार संघात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्व सामान्य माणसाशी समरप होणारा खासदार अशी त्यांची ख्याती आहे. बारणे यांच्या लोकप्रियतेने हवालदिल झालेल्या भाजप नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नितीन गडकरी यांना भाजप नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा सल्ला देण्यापेक्षा महापालिकेतील चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याकडे लक्ष घालण्यास भाग पाडणे आवश्यक होते, असा टोलाही त्यांनी लगाविला आहे.
खासदार श्रीरंग बारणे हेच मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे सक्षम उमेदवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते नेहमीच सरकारच्या चुकीच्या कामांना सरकामध्ये राहून विरोध करीत अंकुश ठेवत आहेत. जनतेच्या भावनांचा आदर करीत राहिले आहे. देशात शिवसेनाचा नाही. तर, भाजपचा पंतप्रधान होण्यासाठी युती हवी अशी हिंदुत्वादी विचाराच्या मतदारांची, सर्वसामन्य जनतेची इच्छा आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच खासदार बारणे यांच्या विरोधात भाजपने पत्रकबाजी सुरु केली आहे.
लोकसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी ही पत्रक बाजी चालवली आहे. बारणे यांच्या नावाला विरोध करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपवाशी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वश्रामीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन प्रसिद्धी मिळवत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी खासदार बारणे यांची उमेदवारी निच्छित केली आहे. त्यांनी संपूर्ण मतदार संघ ढवळून काढला आहे. युती होवो अथवा न हो २०१९ च्या निवडणुकीत बारणे हेच शिवसेनेचे खासदार असणार आहेत, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, जितेंद्र ननावरे, रोमी संधू या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.