पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात आज महत्वाचे विषय होते. त्यावर सर्वांनीच योग्य चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादीने ठरवून गोंधळ घातला आहे. सभागृहात गोंधळाच्या वातावरणात नगरसेवकांना बोलू न देता प्रस्ताव मंजूर करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि मनसे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. चिखलीतील बहुचर्चित संतपीठाची स्थापना, पीएमपीएमएलच्या बसेस खरेदी, तसेच भोसरीतील वादग्रस्त महापालिकेचे रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मान्यतेचे विषय सभागृहात मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र सभेच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलनाला सुरूवात केली. संतपीठाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महापालिकेची इमारत घोषणांनी हादरून टाकली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही राष्ट्रवादीचा गोंधळ सुरू होता. दरम्यान गोंधळाच्या वातावरणातच महापौरांनी सर्वच विषय कोणत्याही चर्चेविना मंजूर केले.
गोंधळाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज झाल्याबद्दल शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि मनसे गटनेते सचिन चिखले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
राहुल कलाटे म्हणाले की, आज सभागृहात झालेला गोंधळ चुकीचा होता. चर्चा करूनच संतपीठाचा प्रस्ताव मंजूर करणे योग्य होते. संचालकपदी वारकरी सांमप्रदायिक मंडळींचा समावेश करणे आवश्यक होते. संचालक मंडळावर महापौर, गटनेते, पदाधिकारी यांचा सहभाग अपेक्षित होता. मात्र कोणालाही विश्वासात न घेता, आम्हाला बोलू न घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या विषयांवर मतदान घेणे गरजेचे होते. झालेल्या गोंधळामुळे शंकेला जागा निर्माण होत आहे. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीने ठरवून गोंधळ घातला असल्याचा आरोप राहुल कलाटे यांनी केला.
सचिन चिखले म्हणाले की, संतपीठाची स्थापना गोंधळात मंजूर केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. धोरणात्मक निर्णय होताना नगरसेवकांना माहिती मिळणे तसेच त्यावर चर्चा होणे गरजेचे होते. स्थानिक नगरसेवक, वारकरी तज्ञांचा समावेश करून घ्यावा अशी मनसेची मागणी आहे. भोसरीतील महापालिकेचे हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालविण्यास देण्यास मनसेचा तीव्र विरोध आहे. आर्थिक निकष ठरवून सर्वांनाच मोफत उपचार देणे गरजेचे होते. ३० वर्षासाठी हे हॉस्पिटल चालवायला दिले जाणार आहे. कोणाचेही नियंत्रण तेथे राहणार नसल्यामुळे मनमानी कारभार चालणार आहे. आज सभेत झालेला गोंधळ म्हणजे लोकशाहीचा गळा घोटला गेला असल्याचे चिखले म्हणाले.