पिंपरी (Pclive7.com):- पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला जनता फसली. तरुणांना रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू अशा अनेक घोषणा मोदींनी केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी प्रचंड बहुमतांनी त्यांना सत्ता दिली. मात्र यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. लोकांनी विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. भाजप-शिवसेना सरकारने केसांनी लोकांचा गळा कापला असल्याचा घणाघाती टिका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार निमित्त निगडी प्राधिकरण येथे उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पार्थ पवार, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक राजू मिसाळ, श्याम लांडे, नाना काटे, योगेश बहल, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुचर्चित असलेली ही सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र शब्दाला पक्के असणारे उदयनराजे नऊ वाजण्याच्या सुमारास सभेच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी पाऊस होऊनही उदयनराजे यांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले की , पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी फक्त ‘मन की बात’ केली. एवढा मोठा अभिनय मी कधीच बघितला नव्हता. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन जनतेची त्यांनी फसवणूक केली. लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिले. मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर त्यांनी जनतेकडेच पाठ फिरवली. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका त्यांनी घेतली. जनता हाच लोकशाहीतला राज आहे. पाच वर्षात या सरकारने देशाची काय अवस्था केली आहे. अनेक जवान शहीद झाले.. मग लोकशाहीतले राजे आज गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, यांना फक्त तुमची मते हवी आहेत. तुमची किंमत त्यांना कळत नाही. शिवरायांना जशी जनतेची किंमत होती, तसेच तुमची किंमत देखील आम्हाला आहे. आता यांची भरसभेत भांडणे सुरू आहेत. काय यांच्याकडून अपेक्षा करायची. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. यांनी देश विकला आहे. आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही. ज्यांच्या जोरावर मोठे झाले त्यांनाच भाजप शिवसेनावाले विसरले आहेत. नॅचरल गॅस, इंधन यांनी विकून टाकलं. बिझनेस इंडिया कंपनी स्थापन केली. लोकांचे खिसे भरण्याचे काम या भाजप-शिवसेना सरकारने केले आहे. देश आज आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे. तरच देश महासत्तेकडे वाटचाल करू शकेल. नोटबंदी हा सरकारने घाईघाईत घेतलेला निर्णय आहे. याने अनेकांना मनस्ताप झाला. यात देशातील जनतेचा खूप मोठा छळ झाला . आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली. स्वतःच्या स्वार्थासाठी हे जातीपातीचे राजकारण करतात. आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र यांनी या बळीराजा कडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांसाठी कुठलचं धोरण ठरवलं नाही. त्यामुळेच देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकरी सदन झाला तरच देश सुदृढ होईल याच भान यांना राहिला नाही. देशातील मोबाईल टॉवर हे चायना मधील एका कंपनीला दिले आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यांना सत्तेतून पायउतार केले तरच देश वाचेल. त्यासाठी मावळ लोकसभेतून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मी म्हणजेच पार्थ पवार असं समजून मतदान करा असं आव्हानही उदयनराजे यांनी यावेळी उपस्थितांना केले.