पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कचरा प्रश्न आणखीनच जटील बनला आहे. कचरा जागोजागी पडून आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. तसेच पावसाळा जवळ आल्यामुळे शहरातील नाले व गटारी यांची यांची साफ-सफाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील कचरा व नाले सफाई त्वरित होणे गरजेचे व आवश्यक आहे. यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरीचा कचरा एकत्र करुन, तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे. या कामासाठी नियमित ठेकेदाराची नियुक्ती अद्याप झाली नसल्यामुळे, जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देऊन, त्यांच्याकडून कचरा संकलनाचे काम करुन घेण्यात येत आहे. परंतु, आजही शहरामध्ये मागील दोन वर्षापूर्वी जी कच-यांची स्थिती होती, तशीच आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग दृष्टीस पडतात. ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्या कच-याने भरुन वाहत आहेत. तसेच शहरातील मोकळ्या जागेतसुध्दा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. तो वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे परीसरामध्ये दुर्गंधी सुटून, रोगराई होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील पवना नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवलेले आहेत, ते सुध्दा भरुन वाहत आहे. एकुणच शहरात कच-याची स्थिती गंभीर आहे.
तसेच आता उन्हाळा संपत आला आहे. लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. परंतु, अद्याप शहरातील नालेसफाई विषयी प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही. शहरातील ओढे, नाले याची वेळेवर साफ सफाई झाली नाही तर, पावसाचे पाणी या नाल्यांमध्ये तुंबून शेजारील लोकवस्तीत घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व ओढे, नाले व गटारी यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अत्यावश्यक आहे.
तरी आपणांस विनंती आहे की, शहरातील घरोघरीचा कचरा एकत्रित करुन, तो मोशी येथील कचरा डेपोवर नियमितपणे हलविण्यात यावा. यामुळे शहरात कचरा साठून राहणार नाही. तसेच शहरातील ओढे, नाले व गटर्स याची पावसाळा सुरु होण्यापूर्वी साफ सफाई करण्यात यावी. म्हणजे पावसाचे पाणी तुंबून नागरीकांची गैरसोय होणार नाही, असे साने यांनी या निवेदनात म्हटले आहे.