पिंपरी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे. तसेच दिंड्यांना भेटवस्तू देण्याच्या निर्णयात दिरंगाई झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी भाजपची असेल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.
महापौर राहुल जाधव यांना याबाबत सुविधा खबरदारी घेण्याचे निवेदन दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान २३ जूनला तर संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान २४ जूनला होत आहे. आकुर्डीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा एक दिवसाचा मुक्काम असतो. आतापर्यंत जाणा-या या सोहळ्यात सहभागी होणा-या वारक-यांची कोणतीही गैरसोय होत नाही. त्याकरिता महापालिकेच्या वतीने दोन महिने अगोदरच सर्व बाबींचे नियोजन केले जाते.
मात्र, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या मार्गक्रमणास अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची प्राथमिक बैठकही झालेली नाही. आता बाकी असलेल्या कमी कालावधीत सर्व नियोजन करण्यासाठी सांप्रदायिक क्षेत्रातील जाणकारांची बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित करावी. तसेच दिडी प्रमुखांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबाबतही निर्णय घेण्याची विनंती या निवेदनात केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे भेटवस्तू खरेदीत दिरंगाई झाल्यास, त्याला सत्ताधारी भाजप सर्वस्वी जबाबदार असेल, असे या निवेदनात नमूद केले आहे.