पिंपरी (Pclive7.com):- समाजातील विविध घटकांसाठी काम करताना आनंद होत असून, आम्ही राबवित असलेल्या उपक्रमांनाही जनतेची साथ मिळत आहे. जयंती महोत्सव, सामाजिक काम आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपण कटीबद्ध असून, जयंती महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच खरी पोचपावती असल्याचे मत माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी व्यक्त केले.
गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेखर ओव्हाळ बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या सादर हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे, संदीप वाघेरे, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह अजिज शेख, गणेश कदम, संदीप ढेरंगे, प्रसाद शेट्टी, गिरीश जाचक, कैलास दांगट, अनुप मोरे, सुरेश निकाळजे, बाबा कांबळे, राजेश पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ओव्हाळ म्हणाले, लोकांच्या कल्याणासाठी कायम तत्पर असल्याने लोकांचीही साथ मिळत आहे. जनसामान्यांच्या उन्नतीसाठी आपण यापुढेही कार्यरत राहू. यानंतर प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला. आनंद शिंदे सहकलाकारांनी ‘धम्म रथ है भीम रथ है, वंदन करतो भीमरायाला, जिसे भीम मिल गया उसे किसी सहारेकी जरुरत नही, यासारखी प्रबोधनात्मक गाणी सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.