आळंदी (Pclive7.com):- इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या भाविकांस आळंदी नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांनी वाचवले आहे. रविवारी (दि.२८) पहाटे साडेपाच वाजता नदी पात्रातून बाहेर काढले. रात्रभर घाटावर असणाऱ्या एका समाधीला अडकून पाण्यातच बसलेल्या या वारकाऱ्याला तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले.
संजय कांदरकर (वय ५४, रा. भोसरी) असे या वाचलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. विलास पवार, अक्षय त्रिभुवन, तुळशीराम कोळपे, पद्माकर श्रीरामे, संजय पवार या जीव रक्षकांनी कांदरकरांना सुरक्षित पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबतची माहिती अशी, आळंदीतील इंद्रायणीच्या पुरात येथील भाविक पाय धुवण्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठावर गेले पण पाय घसरून ते पाण्यात पडले. नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा या घटनेतून प्रत्यय आला.
पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती रात्रभर घाटावर असणाऱ्या एका समाधीला अडकून पाण्यातच बसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले. आज पहाटे साडेपाच वाजता नदी पात्रातून कांदरकर यांना बाहेर काढले. यावेळी घटनेत बचावलेल्या संजय कांदरकर यांनी ही माऊलींची कृपा असल्याचे सांगत जीव वाचविल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले. देवाच्या आळंदीत आषाढी वारीवरुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरवरुन आळंदी नगरीत दाखल होते. यावेळी वारकरी देवाच्या नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी येत असतात. मात्र दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीला महापूर आल्याने वारकऱ्यांना नदीपात्रात जाऊन स्नान करणे अवघड झाले आहे. आळंदी नगरपालिका प्रशासनाने देखील भाविकांनी पाण्यात तसेच नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे.