पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हा फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा विजय आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभा काँग्रेस गटनेता म्हणून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. आमदार थोरात यांची निवड म्हणजे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची बैठक बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) प्राधिकरण आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी साठे बोलत होते. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी तसेच प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव माजी महापौर कविचंद भाट यांनी मांडला. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवार (दि.२५) पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्याविरोधात महापालिकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.2 डिसेंबर) शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, निगार बारस्कर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, टि.व्ही. उन्नीकृष्णन, एन.पी.रवी, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, संदेश नवले, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, आशाताई शहाणे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, दिलीप पांढरकर, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, निर्मल तिवारी, व्हिक्टर सिंगआर्यन, माधव पुरी, हुरबानो शेख, दिनकर भालेकर, मिना गायकवाड, एस.ए.सिलम, पांडूरंग जगताप, सुभाष भुसणे, गौरव चौधरी, वसिम शेख, उज्वला महल्ले, शितल कोतवाल, नझीया बारस्कर, वैभव किर्वे, अजहर चौधरी, दिपक जाधव, विष्णू खरे, सचिन नेटके, बाबूलाल वाघमारे, किशोर तांगडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत भाजपा हुकूमशाही व दडपशाही पध्दतीने सरकार स्थापन करु इच्छीत होते. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने संविधान स्थापनेच्या दिनादिवशीच दिलेल्या निकालाने लोकशाही न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास आणखीनच दृढ झाला. भाजपा ज्या पध्दतीने देशभर नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करीत आहे. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पदाधिकारी व प्रशासन स्थानिक नागरिकांचे हक्क डावलत आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही शहरभर सोमवार पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. स्वच्छ, मुबलक पाणी मिळणे हा करदात्या नागरिकांचा हक्क आहे. तो त्यांना मिळवून देण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२ डिसेंबर) सकाळी १० वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महापालिका भवनापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन साठे यांनी यावेळी केले. स्वागत वसिम इनामदार, आभार विशाल कसबे यांनी मानले.