आळंदी (Pclive7.com):- मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं. पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो, असं पवारांनी सांगितलं.
विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असं पवारांनी स्पष्ट केलं.
जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करु नये, अशी भूमिका घेतली होती. यावर अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांसमोर पवार काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
‘मी इथे मनात कोणताही हेतू ठेवून आलेलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर अशा ठिकाणी मी नेहमी जातो. पण कोणतंही प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नसतो. मी पंढरपूरला अनेकदा जाऊन आलो, ते कोणाला माहितही नसेल. कारण पहाटे चारला वगैरे मी जाऊन दर्शन घेतो. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही, असा गैरसमज आहे. पण त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही’ अशा शब्दात पवारांनी वारकरी परिषदेला सुनावलं.