पिंपरी (Pclive7.com):- देशातील वाढती बेरोजगारी व त्या मुळे होत असलेले तरूणांचे हाल व दुर्दशा पाहता आज (दि.१८) युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन राष्ट्रीय स्तरावर बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकार विरोधात “मी बेराजगार कोण जबाबदार” हे आंदोलन केले.
यावेळी बेरोजगारीची गंभीर समस्या व त्याचे सामाजिक दुष्परिणाम याबाबत केंद्र सरकारला जाब विचारण्याबाबतची पत्रके वाटण्यात आली. याप्रसंगी युवकांकडून प्रतिकात्मक स्वरूपात हातगाडीवर केळी व नारळ विक्री करत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. नागरी अपेक्षांबाबत मोदी सरकारने नागरिकांना नैराश्य दिले, याबाबत हातात केळी घेऊन युवकांनी प्रतिकात्मक निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना डॉ.कैलास कदम म्हणाले “या केंद्रातील सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यापैकी एक मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी आहे व यामुळे कुटूंबे उध्वस्त होताना दिसून येत आहेत. देशात मोठ्या प्रमाणात असलेला युवक आज हवालदिल होऊन बेजार झाला आहे. कामगार कायदे अन्यायकारकपणे लादले जात आहेत. त्यामुळे नोकरीला असणारा युवक सुध्दा सुरक्षित राहीला नाही.
कारण त्याच्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार लटकत आहे. व पंतप्रधान याबाबत काहीचबोलताना दिसत नाहीत. ते केवळ जाहीरात बाजीत व्यस्त असतात. हे सरकार केवळ अपयशीच नाहीतर फसवे व अन्यायकारक ठरले आहे. हे सरकार बदलवने आता आपली प्रथम जबाबदारी आहे हे जाणून नागरिकांनी दक्ष राहीले पाहीजे. व देश व्यापी परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे आणि हे जन आंदोलन अधिक सक्षम केले पाहीजे.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, आज प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरूणास मी बेरोजगार, याला कोण जबाबदार ? असा प्रश्न भेडसावत आहे व या बेरोजगारीमुळे देशातील युवक हा गुन्हेगारीकडे, जुगाराकडे व शेवटी कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्यांकडे देखील वळत आहेत. व हे सर्व आपल्या आजच्या युवा देशासाठी अत्यंत घातक आहे. आज मोदींजींचा वाढदिवस आहे. त्यांना या विषयीचे गांभीर्य अधिक तीव्रतेने कळावे यासाठी आज देशव्यापी स्वरूपात हे आंदोलन युवक काँग्रेसच्या माध्यमातून करून सर्वसामान्य तरूणांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. व या अडचणीच्या काळात ‘काँग्रेस का हात हमेशा आपके साथ’ हा संदेश देत आहोत.
देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते तेही गेले आणि 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणा-या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी आंदोलनात सहभागी आहोत.
या प्रसंगी पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम ईनामदार, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस रवी नांगरे, अलोक लाड, अर्णव कामठे, योगेश नायडू,गणेश नांगरे, अनिल सोनकांबळे, एकनाथ मुंढे, प्रकाश पठारे, असिफ शेख, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे, सोहेल मुलाणी, अजय काटे, प्रथमेश वाघमारे, शिवा पल्लेडवाड, विक्रम कुसाळकर, सुमित मंडल, रोहन मडिकर आदि उपस्थित होते.