पुणे (Pclive7.com):- उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट आल्याने राज्यातील तापमानात मंगळवारी कमालीची घट झाली. राज्यातील दहा जिल्ह्यांतील थंडीचा पारा दहा अंशांपर्यंत खाली उतरला होता. पुढील २४ तासांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, सौराष्ट्र आणि कच्छ, तेलंगणा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असून आकाशही निरभ्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट असून ती आणखी तीव्र झाली आहे. याचा परिणाम विदर्भात जाणवत आहे. त्यामुळे नाताळपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, नाशिक आणि सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, तर विदर्भातील अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवला गेला. दिवसभरात सर्वांत कमी तापमान जळगाव येथे सात अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक तापमान सांताक्रुझ येथे ३२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.