मुंबई (Pclive7.com):- राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री पाटील यांनी उत्तर देताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु, सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाई
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी पूर्ण लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत थांबणार नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.