पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला ‘एमआयएम’ पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णया विरोधत पिंपरीत एमआयएमच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लमिन (एम आय एम) पक्ष प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, महासचिव अकील मुजावर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या नेतृत्वात निगडी येथील अंकुश चौक येथे एमआयएम पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले. याचे नियोजन शहर सचिव कुतुबुद्दीन होबळे यांनी केले.
यावेळी महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख, महासचिव ऍडव्होकेट शबाब इनामदार, संपर्क प्रमुख शब्बीर शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, फिरोज तांबोळी, अकिब शेख, नेते नियाज देसाई, वसीम तांबोळी, समीर शेख, पाकिजा शेख, मौलाना मोईन मुलांनी, गाझी शेख इतर पदाधिकारी सदस्य व स्थानिक नागरिक महिला यांनी सहभाग घेतला होता.
पिंपरी चिंचवड एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे व वाईन म्हणजे दारू नाही, असे सांगते आहे. मात्र असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थापासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दु:ख होते. शेतकऱ्यांचेच हित पाहायचे असेल तर शेतीमालाला केंद्र सरकारने व राज्य सरकारने हमीभाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षांत १ हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दिष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार, हा खरा प्रश्न आहे. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे, असा अट्टाहास दिसून येतो.
वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे. तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यास सरकारने प्राधान्य देणे, जनतेसाठी दुर्दैवी आहे. पिंपरी चिंचवड शहरात ७२ पेक्षा अधिक झोपडपट्या आहेत. त्यामध्ये सरार्स बेकायदेशीर दारू, हातभट्टी, अंमली पदार्थ विक्री होत आहेत यातच हा निर्णय कुटुंब उध्वस्त करण्याचा आहे. जर शहरात हा निर्णय लागू झाला तर एमआयएमपक्ष हे दुकान फोडणार असे मत व्यक्त करत धम्मराज साळवे यांनी भूमिका मांडली.