पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर १४ दिवसांत एकूण ५ हजार ६६४ हरकती पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यावर दि.२५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
प्रभाररचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर सोमवारपर्यंत (दि.१४) सूचना व हरकती स्वीकारण्यात आल्या. त्यात तब्बल ५ हजार ६६४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. एकच प्रभाग आणि विशिष्ट कारण असलेल्या हरकती एकत्रित केल्या जाणार आहेत. तसेच हद्द, वर्णन, नाव व इतर कारणांसाठी असलेल्या हरकतींचे येत्या दोन दिवसांत वर्गीकरण केले जाणार आहे.
त्याचा अहवाल बुधवारपर्यंत (दि.१६) राज्य निवडणूक आयोगाकडे तसेच, सुनावणीचे प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२५) सुनावणी होणार आहे. सुनावणीचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास महापालिकेकडून सादर केला जाणार आहे. गेल्या फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीच्या वेळेस १ हजार ४०० हरकती प्राप्त झाल्या होत्या.
शहरातील सर्वाधिक हरकती या भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभागांसंदर्भात नोंदविण्यात आल्या क्रमांक १, ५, ६, ७, ८, ९, १०, १४ या प्रभागांचा समावेश आहे. तसेच, ४२ व ४३ प्रभागासंदर्भात हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. एकसंध भाग नसणे, दुसरीकडे जोडलेला भाग पुन्हा प्रभागास जोडा, एखादी वस्ती काढा किंवा समाविष्ट करा, या प्रकारच्या सर्वाधिक हरकती आहेत.
वर्गीकरणानुसार एकत्रित सुनावणी होणार
एकच प्रभाग व एकाच कारणांच्या हरकतींवर एकाच वेळी सुनावणी केली जाणार आहे. ती हरकत घेणाऱ्यांना त्या वेळी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच, हद्द, वर्णन, नाव व इतर कारणांच्या हरकती एकत्रित करून त्यांना सुनावणीस बोलाविले जाणार आहे. सुनावणीनंतर त्यांना उत्तर दिले जाणार नाही, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी स्पष्ट केले.
चऱ्होली, भोसरी, गव्हाणेवस्तीबाबत हरकतींचा पाऊस
चऱ्होली प्रभाग क्रमांक ५, दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक ६, भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर, गव्हाणेवस्ती प्रभाग क्रमांक १०, तसेच, कासारवाडी प्रभाग क्रमांक ४२ आणि दापोडी प्रभाग क्रमांक ४३ या प्रभागांसंदर्भात सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. एक हजार ते दीड हजारांच्या संख्येने हरकतींचे गठ्ठे सादर करण्यात आले आहेत. एकच हरकत असून, त्यावरील केवळ नावे बदलण्यात आली आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार वर्गीकरण केल्यानंतर हरकतींची संख्या केवळ ५० असेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२ मार्चनंतर होणार प्रभागरचना
हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे. त्यानंतर आठवडाभरात अंतिम प्रभागरचनेचा आराखडा जाहीर केला जाणार आहे. त्यावरून हरकतींची दखल घेतली किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या इच्छुकांना आपआपल्या प्रभागात काम करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, प्रभागनिहाय मतदारयादीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.