पिंपरी (Pclive7.com):- सध्या अनेक गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे किल्ले परिसरात अस्वच्छता पसरली आहे. हे पाहून उद्विग्न झालेल्या रुपीनगर परिसरातील इतिहासप्रेमी तरुणांनी राज्यातील १९० किल्ल्यांची साफसफाई केली आहे.
रुपीनगर परिसरातील इतिहासप्रेमी तरुणांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवयोद्धा भटकंती ग्रुपची स्थापना केली आहे. ‘गडकोटांवर निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा’ या ब्रीद वाक्याने झपाटलेल्या तरुणांनी १९० हून अधिक किल्ले सर केले. तेथे साफसफाई, डागडुजीकरून “गडकिल्ल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनात खारीचा वाटा उचलला आहे.
एप्रिल २००८ मध्ये पिंपरी चिंचवड ते रायगड असा सायकलवर प्रवास केला होता. तीच घोडदौड आजही परिसरातील तरूणांकडून त्याच जोमाने सुरू आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना शिवयोद्धा भटकंती ग्रुपचे तरुण भेट देतात. आदिवासी भागातील गडकिल्ल्यांच्या परिसरातील मुलांना अन्नदान, कपडे वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम राबवितात.
या ग्रुपच्या तरुणांनी आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांतील गिरी दुर्ग, मल दुर्ग, स्थल दुर्ग, भुईकोट किल्ल्यांची भ्रमंती केली. गडकिल्ले संवर्धन करून शहरातील नागरिकांपर्यंत संवर्धनाची माहिती पोहोचविण्याचे काम ग्रुप करीत आहे.
गडकिल्ल्यांवरील अस्वच्छता पाहून आम्ही शिवयोद्धा भटकंती ग्रुपची स्थापना केली. दुर्ग संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. याच उद्देशाने गडकिल्ले संवर्धनाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, अशी माहिती शिवयोद्धा भटकंती ग्रुपचे श्रीकांत भालेकर यांनी दिली.