देहू (Pclive7.com):- आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान वाकड येथील शेतकरी ज्ञानेश्वर उद्धव शेडगे यांच्या हिरा-राजा आणि धायरी गावातील सागर निवृत्ती टिळेकर यांच्या हिरा-मोती या बैलजोडीस मिळाला आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी रविवारी (दि.२९) दिली.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरवर्षी संस्थानकडे इच्छुक शेतकरी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा म्हणून अर्ज करतात. संस्थानकडे विविध भागातून १५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जावून संस्थान विश्वस्त मंडळाने बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. त्यानुसार १५ पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडल्या. संस्थानने देऊळवाड्यात रविवारी अंतिम दोन बैलजोडीची सर्वानुमते निवड केली. यात शेडगे आणि टिळेकर यांच्या बैलजोडीस मान मिळाला.
याबाबत वाकड येथील ज्ञानेश्वर शेडगे यांनी सांगितले, की गेले २०१६ पासून पालखी सोहळ्यात बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, यासाठी संस्थानकडे अर्ज करत होतो. यावर्षी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. घरात वारकरी संप्रदाय आहे. तुकोबांची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा होती. ही संधी मिळाल्याने आनंद झाला. हिरा-राजा ही जोडी कर्नाटकमधून खरेदी केली आहे. दहा लाख रुपये किमतीची बैलजोडी आहे. धायरी येथील सागर टिळेकर म्हणाले, ‘‘यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, अशी इच्छा होती. संत तुकाराम महाराज संस्थानने सेवा करण्याची संधी दिल्याने आनंद होत आहे.’’
त्याचप्रमाणे पायी वारीतील चौघडा गाडीसाठी शेतकरी जालिंदर यशवंत बोत्रे यांच्या बैलजोडीस मान मिळाला आहे.