आळंदी : प्रसाद बोराटे (Pclive7.com):- आळंदी-माऊलींचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले आहेत.पालखी सोहळ्यातील परंपरेप्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने आळंदीच्या वेशीवर हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले.
श्रींचे अश्व अंकली (ता.चिकोडी, बेळगाव, कर्नाटक) येथील राजवड्यातून अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. प्रवसांनातर आळंदीत प्रवेश करण्यापूर्वी अश्व प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर सरदार बिडकर वाड्यात विसावले. येथे बिडकर परिवारा तर्फे अश्वांची पूजा तसेच स्वागत करण्यात आली. बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माऊलींच्या मंदिरात अश्व आळंदीत आल्याचा निरोप मिळताच श्रीगुरू हैबतराव बाबा यांच्या दिंडीने प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत केले.
यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर, बाळासाहेब महाराज चोपदार, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुप्त विभागाचे मच्छीन्द्र शेंडे, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, कर्ण सेवेचे मानकरी भीमराव वाघमारे, बल्लाळेश्वर वाघमारे आदींसह आळंदीतील ग्रामस्थ वारकरी भाविक उपस्थित होते.
सनईच्या वादनात हरिनामाच्या गजरात मानाच्या अश्वांचे आळंदीत स्वागत करण्यात आले. अश्व माऊलींच्या मंदिरात आल्यानंतर पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर यांनी श्रींच्या अश्वांचे स्वागत केले. माऊलींच्या मंदिरात प्रदक्षिणा झाल्यांनातर कारंजा मंडपात संस्थांनच्या वतीने अश्वपूजा झाली. मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. अश्वपुजेनंतर अश्व फुलवाले समाज धर्माशाळेत मुक्कामी पोहोचले.