मुंबई (Pclive7.com):- बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिसा बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी 27 जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना आता सोमवारी 27 जूनपर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. या कालावधीत नोटिसीला उत्तर न दिल्यास या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षनुसार कोर्टात रंगणार असल्याची आता दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधा एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहे.
कोण आहेत 16 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे