पिंपरी :- पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळं रविवारी सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांच्या निधनामुळं पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ‘साधुत्व’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
वयोमानामुळं गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्यानं काल सकाळी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचं पार्थिव साडेआठ वाजता वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून साडेबारापर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.
तब्बल ३० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून काम केलं. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ‘लिटरेचर इन हरी’ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील लिखाणाबरोबच साधू यांचं इतर लेखनही सातत्यानं सुरू होतं. विविध कथासंग्रहांसह तब्बल १२ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. राजकीय पार्श्वभूमीच्या त्यांच्या कादंबऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर आलेला चित्रपटही गाजला. कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी समकालीन इतिहासाचंही लेखन केलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणामुळं मराठी वाचकांना रशिया, चीन व क्युबातील साम्यवादी क्रांत्यांची ओळख झाली. विशेषत: तरुणांमध्ये साम्यवादी राजकारणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. पत्रकारितेतून आल्यामुळं त्यांच्या लिखाणात एक सहजता होती. त्यामुळंच कठीण विषयही ते सहज समजावून सांगत.