पिंपरी (Pclive7.com):- देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त, चिखली – मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये जेष्ठ अभियंता प्रा.डी.आर. करनुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ज्यांनी स्वातंत्र्य पूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ अनुभवला असे ८९ वर्षाचे जेष्ठ अभियंते प्रा. करनुरे यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
प्रा. करनुरे यांनी स्वातंत्र्यपूर्वी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले, स्वातंत्र्यानंतर जे सैनिक देशासाठीचे धारातीर्थी पडले. त्यांचे योगदान आणि महत्व यांचे किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. प्रा. करनुरे यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असा होता, यावेळी ते शाळेच्या बालचमूमध्ये रमून गेले होते.
या तिरंग्याचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. थोर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले तो आजचा दिवस १५ ऑगस्ट, भारतमातेच्या आबालवृद्धांना अभिमान वाटावा असा दिवस, देशासाठी समर्पित असलेला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस सोहळा, विशेष करून भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शाळेमध्ये गेले तीन दिवस साजरा केला गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूक विभाग यांच्या वतीने जनजागृती ध्वज रॅली, स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक मुक्ती अभियान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
संचालिका कमला बिष्ट यांनी गेले तीन दिवस सुरू असलेल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उपक्रमात कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी, आजच्या दिवसानंतर ज्या ठिकाणी रस्त्यावर, परिसरात व इतरत्र पडलेल्या झेंड्यांना सन्मानाने शाळेमध्ये एकत्र करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले तसेच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांची परेड मार्च, स्वातंत्र्य वीरांना स्मरणात ठेऊन, भारत मातेची प्रतिज्ञा घेऊन, झेंड्यांच्या जयघोषात कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना, तिरंग्यास प्रणाम करून आगळा-वेगळा उपक्रम म्हणून देशभक्तीपर कविता, गाणी, वाद्यवादन, प्रभोधनपर व्याख्यान, एकल आणि समूह नृत्य-अविष्कार, नृत्य-कसरती आदींचे धमाल सादरीकरण केले.
तसेच प्रयाग मिसाळ आणि श्रेयस कदम या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मधून स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती दिली. निशांत सुतार आणि झुल्फाह शेख या विद्यार्थ्यांनी हिंदी मधून कविता केल्या. सरते शेवटी विद्यार्थ्यांनी गायलेल्या वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.