आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव या निमित्ताने करून दिली गेली.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी आळंदी नगरपरिषद कार्यालय येथे तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याधिकारी अंकुशजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणाअगोदर नगरपरिषद शाळेतील एका लहान मुलांने देशभक्ती पर गीत गायले. आळंदी शहरात यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. विविध ठिकाणी हर घर तिरंगा या मोहिमेनुसार सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला आहे. या दिवशी ऑफिसेस, शाळा आणि इतर कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आळंदी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ढोल ताशे व लेझीम च्या खेळासह भारत माता की जय या जय घोषात नगरपरिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. देशाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त आळंदीतील वारकरी संप्रदायातील नागरिकांनी टाळ, मृदुंगाच्या वाद्यात हरिनामाच्या गजरात हाती तिरंगा ध्वज घेत प्रभात फेरी काढली. तसेच भारत माता की जय या घोषणा देत स्वकाम सेवा मंडळ या संस्थेनी ही प्रभात फेरी काढली. तर आळंदी पोलीस स्टेशनचे पोलिस आधिकारी व कर्मचारी तसेच आळंदीतील ग्रामस्थ यांनी अमृतमहोत्सवा निमित्त बाईक रॅली काढली. स्वराज ग्रुप, लायन्स क्लब ऑफ पुणे रेड प्लस ब्लड बँक यांने स्वातंत्र्य दिना निमित्त ज्ञानदर्शन धर्मशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.