नवी दिल्ली (Pclive7.com):- काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर हे दोन मोठे नेते आमनेसामने होते. दरम्यान, आज मतमोजणी होणार असून दोघांपैकी कोण काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.
सोमवारी (१७ ऑक्टोबर) रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी ९६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या ९,९०० प्रतिनिधींपैकी ९,५०० प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत १०० टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास ९० टक्के मतदान झाले होते.
या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होती. खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला.