पिंपरी (Pclive7.com):- आळंदी येथील कार्तिकी सोहळ्यानिमित्त टपरी, पथारी, फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्थानिक भूमिपुत्रांना वगळून इतर मोठ्या विक्रेत्यांनी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. हे चुकीचे असून आळंदीतील कार्तिकी सोहळ्यानिमित्त विक्रेत्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने करण्यात आली. बाबा कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने आळंदी पोलीस प्रशासन, नगरपरिषदेतील संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, आळंदी व खेड तालुका संयोजक ऍड. प्रियस सोनवणे, आळंदी शहराध्यक्ष सुलतान शेख, उपाध्यक्ष रामदास मेत्रे, मुकुंद दिंनडाळ, महादेव भालेराव, मंचक यादव, तानाजी दौंडकर, दत्तात्रय जांभळे, सुनील राऊत, गोरख कलाटे, ज्ञानेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा सुरू होत आहे. या निमित्ताने लाखो वारकरी, भाविक, भक्त आळंदी येथे सोहळ्याच्या निमित्ताने येतात. या वेळी प्रसाद, फळ, फुल, अष्टगंध, बुक्का, कुंकू, प्रसाद विकणारे विक्रेते देखील मोठ्या संख्येने आळंदीमध्ये येतात. आळंदी नगर परिषदेच्या वतीने स्थानिक जागेचा निलाव करून सदर जागा कार्तिकी निमित्त येणाऱ्या बाहेरील मोठे विक्रेत्यांना देण्यात येते.
तसेच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या टपरी, पथारी, हातगाडीधारक फळे आणि फुल विक्रेते भाजी विक्रेत्यांवर मात्र कारवाई केली जाते. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाच्या बैठका सुरू असून प्रशासकीय नियोजनाच्या व कार्तिकी सोहळ्याच्या बैठकीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना व विक्रेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येते. हा गोरगरीब कष्टकरी जनतेवर होणारा अन्याय आहे. इतर दिवशी लाखो भाविकांना सेवा देणाऱ्या स्थानिका भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी या वेळी दिली.