पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. यावरून संतापलेल्या माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी महिलांसमेवत सोमवारी (दि.१४) पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी आदी भागांतील पाणीपुरवठा शुक्रवारी (दि.११) पूर्णपणे विस्कळीत झाला होता. यावरून नागरिकांची ओरड सुरू झाल्यामुळे माजी नगरसेविका तापकीर यांनी आक्रमक भूमिका घेतली. शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा, म्हणून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चऱ्होली भागात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून वारंवार दुरस्तीच्या नावाखाली शटडाऊन घेण्यात येत आहे. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शटडाऊनमुळे पाणीपुरवठा विस्कळीत
चिखली येथील मुख्य जलवाहिनी इतर उपजलवाहिन्यांना जोडणीचे काम सध्या सुरू आहे. यासाठी शटडाऊन घेण्यात आला होता. यामुळे जाधववाडी, बो-हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२ यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले.