पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात चांगलेच फटाके वाजलेत. सत्तेत आलेले भाजप पहिल्या सहामाहीत सपशेल नापास झाले आहेत. त्यांच्यात आणि प्रशासनात नियोजनाचा अभाव आहे, पदाधिकार्यांना कचर्याचे गांभिर्य नाही असे सांगत कचर्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेत धारेवर धरले. त्यात भाजपच्याच नगरसेवक राहूल जाधव आणि अभिषेक बारणे यांनी कचरा प्रश्नी आवाज उठवल्यामुळे सत्ताधार्यांना घरचा आहेर मिळाला.
आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेच्या सुरूवातीला भाजप नगरसेवक राहूल जाधव यांनी कचरा प्रश्न किती गंभीर झाला आहे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, शहरात कचरा समस्या वाढली आहे. घंटागाडी येत नाही, गाड्या सतत नादुरूस्त असतात त्यामुळे कचरा वेळेत उचलला जात नाही.
राहूल जाधव यांनी मांडलेल्या समस्येकडे लक्षवेधत भाजप सदस्य अभिषेक बारणे म्हणाले की, मी स्वत: प्रभाग अधिकारी आहे. तरी देखील अधिकारी ऐकत नाहीत. फोन उचलत नाहीत. मिटींगमध्ये आहोत अशीच उत्तरे मिळतात. नागरिकांच्या तक्रारींना तोंड देण्यातच दिवस जात असल्याचे म्हणाले.
शिवसेनी नगरसेविका मिनल यादव म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियान राबविण्यापेक्षा शहरातील करर्याच्या समस्येवर काहीतरी मार्ग काढा. ऐंन दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी संपावर गेलेत. प्रभागातील कचरात उचलला जात नसल्यामुळे नागरिक जाब विचारत आहेत. लवकरात लवकर आयुक्तांनी त्याबाबत मार्ग काढावा.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने म्हणाले की, पंतप्रधान यांच्या माध्यमातून देशभरात स्वच्छता अभियान राबविला जात आहे. मात्र शहरातील केवळ सत्ताधारी नगरसेवक फक्त फोटोसेशन करत आहेत. आठवडा झाला शहरातील कचरा उचलला जात नाही. घाणीचे साम्राज्य वाढले आहे. डेंगूने शहरात थैमान घातले आहे. मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी आंदोलन केले की त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. ६ महिने झाले त्याच त्याच विषयावर आम्हाला बोलावे लागत आहे. कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न नागरकांना पडला आहे. प्रशासन झोपले आहे का? आयुक्तांना स्वच्छतेचे गांभिर्य नाही. वेळ पडली तर आयुक्तांच्या घरात कचरा नेऊन टाकणार आहोत. येत्या ४ दिवसात कचर्याची विल्हेवाट लावा. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, राहूल जाधव यांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला आहे. कचर्याची परिस्थिती अतिशय भयंकर झाली आहे. शहरात कुठल्याही चौकात गेलात तर कचराच दिसून येईल. स्वच्छता अभियानापूर्वीच तो परिसर स्वच्छ केलेला असतो. त्यामुळे केवळ फोटोसाठीच हे अभियान राबविले जाते. प्रशासनानने वेळीच निर्णय न घेतल्यास प्रायव्हेट ट्रँक्टर लाऊन कचरा उचलून घेऊ.
शिवसेना नगरसेवक निलेश बारणे म्हणाले की, कचर्याची समस्या ६ महिन्यापासूनच वाढलीय. यात काहीतरी गौडबंगाल आहे. जाणिवपूर्वक समस्या वाढत चालली आहे. राजकोटला ब्लँकलिस्ट मध्ये असलेल्या कंपनीला टेंडर दिले गेले आहे.
शिवलेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले की, स्वच्छ भारतच्या नावाखाली मॉडेलिंग चालू आहे. अधिकारी, पदाधिकारी यांच्यात नियोजनाचा अभाव आहे. कृत्रिमरित्या कचरा वाढविला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. ५५ रूग्ण स्वाईन फ्लूने दगावलेत. सत्ताधार्यांचा वचक प्रशासनावर नाही. राजकारण बाजूला ठेऊन कचर्याचा प्रश्न मिटवा. शहर अपेक्षेने आयुक्तांकडे बघत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील.
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, अजित पवारांनी दिलेला दाखला एकनाथ पवारांना पटला नाही. मात्र त्याच्याच नगरसेवकांनी दिलेल्या दाखल्याने सत्ताधारी भाजप सहामाहीत नापास झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मनमर्जी प्रमाणे प्रभाग तोडलेत. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अधिकार्यांचे नियोजनशुन्य काम सुरू आहे.