पुणे (Pclive7.com):- पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. नवले पुलाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, हे तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अपघातातील जखमींना योग्य उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. जखमींवर दीनानाथ मंगेशकर आणि नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या ३५ ते ४० लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बाह्यवळण मार्गावर वेगाने निघालेल्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल तसेच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि ‘हेल्प रायडर्स’ संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात दुचाकी, २३ चारचाकी वाहनं, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. बाह्यवळण मार्गावरुन टँकर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकरने वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली आहेत.