पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला आठ महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. तरीही, सांगवी परिसरात एकही नवीन काम मंजुर झाले नाही. राष्ट्रवादीच्या काळात मंजुर असलेले विकास प्रकल्पही ठप्प असून त्याला भाजप नगरसेवकांचा खोडा असल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे यांनी केला. तसेच ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांचा पुरता विसर पडल्याचेही, शितोळे यांनी म्हटले आहे.
अतुल शितोळे यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी प्रभाग क्रमांक ५९ जुना व नवीन ३२ मध्ये विविध कामांच्या निविदा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात मंजुर करण्यात आल्या होत्या. या कामाचे आदेश देवूनही एक वर्ष झाले तरी विकास कामांना मुर्हूत लागत नाही. भाजपाचे काही नगरसेवक या विकास कामामध्ये खोडा घालत असल्याचा आरोप शितोळे यांनी केला आहे. आपण स्थायी समितीचे अध्यक्ष असताना सांगवी परिसरातील प्रभाग आदर्श व्हावा. नागरिकांना सर्व सुख-सुविधा मिळाव्यात यासाठी जास्तीत-जास्त निधी आणला. काही कामेही सुरू केली. परंतु, महापालिका निवडणुकीनंतर ही कामे ठप्प झाली आहेत.
महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन आठ महिने झाले. तरी, मंजुर झालेले विकास प्रकल्प अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. भाजपच्या नगरसेवकांना केवळ आयत्या पिठावर रेघा ओढायच्या आहेत, तेही त्यांच्याकडून होत नसेल तर नागरिकांचे एक आदर्श प्रभागाचे स्वप्न स्वप्नच राहील, अशी खंतही शितोळे यांनी व्यक्त केली आहे.