पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे आयोजित केलेल्या विचारवेध प्रशिक्षण कार्यक्रमास महिला आणि तरुण कार्यकत्यांच्या अनुपस्थितीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. आता ‘आओ जावो, घर तुम्हारा’ असं चालणार नाही. निष्क्रिय कार्यकर्त्यांवर कारवाई करणार आहे. याचं काय आणि त्याचं काय? हे आता मी ऐकून घेणार नाही. त्यासोबतच मेरिट असणाऱ्यांनाच महापालिका निवडणुकीत संधी देणार आहे, सत्ताधारी भाजपच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवा, तसेच पक्षसंघटना मजबूत करा, असेही मार्गदर्शन अजित पवार यांनी केले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेले विचारवेध प्रशिक्षण वाल्हेकरवाडी येथे झाले. यावेळी विविध माध्यम प्रतिनिधींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात उद्घाटनाच्या वेळी अजित गव्हाणे म्हणाले, गेली पाच वर्षे भाजपने भूलथापा देऊन लूट केली आहे. सत्ताधारी भाजपने केवळ भ्रष्टाचार केला असून एकही ठोस असे काम केलेले नाही. त्यास कारणीभूत दिशाहीन नेतृत्व आहे. पाणीपुरवठा, संतपीठ, अर्बन स्ट्रीटच्या कामांत गैरव्यवहार केले आहेत.
जे उपस्थित नाहीत त्यांची मला माहिती द्या..
अजित पवार यांनी भाषणात स्थानिक नेत्यांची हजेरी घेतली. कानही टोचले. पवार म्हणाले, मयूर कलाटे, राजू मिसाळ, डब्बू आसवानी कुठे आहेत. त्यावर उपस्थितांमधून लग्न किंवा अन्य कार्यक्रमांना गेल्याचे कार्यकत्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, बघा नक्की लग्नालाच गेलेत का अन्य कोठे?’ याबाबत अध्यक्षांनी मला माहिती द्यावी असं शेवटी बोलताना ते म्हणाले.