पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वर्षानुवर्ष पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढुन मोकाट कुत्र्यांना पकडुन त्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामाचा ठेका देण्यात येतो. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र कुत्र्यांची संख्या निर्बिजीकरणानंतरही नियंत्रणात येण्याऐवजी ती कशी वाढत आहे. असा प्रश्न शहरातील वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
निवेदनात ते पुढे म्हणाले की, मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात भटकी कुत्र्यांच्या प्रचंड वावर असुन त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ऐन मध्य रात्री कुत्र्यांच्या भुकंण्याने नागरिकांची निद्रानाश होते तसेच लहान मुले घाबरून जागे होतात. दिवसा हि कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरुन धावतात त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा औद्योगिक परिसर असल्याने दुपार आणि रात्र पाळी करून घरी जाणाऱ्या कामगारांच्या वाहना मागे कुत्रे धावल्याने अनेक अपघात झाले असून बऱ्याच वाहन चालकांना चावा घेतला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांसह इतर रुग्णालयात श्वानदंशांच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.