मुंबई (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी (दि.९) विधानसभेत राज्याचा २०२३-२०२४ चा अर्थसकंल्प सादर केला. यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत असून त्यात राज्य सरकार आणखी ६ हजार रुपये घालणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील. याचा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आहे. तर याचा ६,९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा मिळेल. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर कोणताच भार नसले. राज्य सरकार हा हप्ता भरेल. याचा ३,३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ देण्यात येतील. २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देण्यात येतील. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले. यातून १२.८४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४६८३ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.