पिंपरी (Pclive7.com):- कोणतीही संस्था नावारूपाला येण्यासाठी संघभावना महत्वाची असते. संचालक मंडळ, प्रशासन, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय असेल, एकोपा असेल, आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असेल तर संस्था मोठी होते. असे मत प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले.
ते प्रेरणा बँकेच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर, चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाइस चेअरमन सुरेश पारखी, संचालक श्रीधर वाल्हेकर, संजय पठारे, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, नंदकिशोर तोष्णीवाल, अजितकुमार जाधव, राजाराम रंदील, राजेंद्र शिरसाठ, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्याचे दर्शन कर्मचाऱ्यांनी घडवले. गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करण्यात आले.
कांतीलाल गुजर पुढे म्हणाले, आपण समाजाचे एक घटक आहोत, समाजाचे आपण देणे लागतो. आपण सर्व एक आहोत, एकसारखे आहोत, ही भावनाच आपल्याला पुढे नेऊ शकते. हीच आपली संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. नव्या पिढीकडे ती सुपूर्द केली पाहिजे. मतभेद, रुसवे – फुगवे, द्वेष, मत्सर या गोष्टी माणसाला आनंदापासून दूर नेतात. चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर कायमच कौतुकाची थाप पडत असते. ते त्याच्यासाठी प्रोत्साहन तर असतेच, शिवाय प्रेरणाही असते.
व्हाइस चेअरमन सुरेश पारखी म्हणाले, जो काम करतो, तो पुढे जातो. प्रत्येकाला चांगल्या कामात पुढाकार घेता यायला हवा. जबाबदारी दिली तरच काम करायचे यापेक्षा जबाबदारीची जाणिव ठेवून काम केले तरच स्वत:ला सिद्ध करता येते आणि कौतुकही निश्चित होते.
याप्रसंगी संचालक संतोष मुंगसे, नाना शिवले, अजितकुमार जाधव यांनी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मेघनाद बोडस, किरण गायकवाड, प्रविण टेकवडे, विनोद कुसुंबेकर यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.विनय चंद्रात्रे यांनी बदलत्या आव्हानांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन केले.
श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रभागा भिसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किरण शेळके, संचीता जगताप, सविता कदम, जितेंद्र गाडे यांनी केले.