नवी दिल्ली – भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत भारताने विजय मिळविला आहे. भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) न्यायाधीशपदी निवडून आले आहेत. अंतिम क्षणी ब्रिटनने आपली उमेदवारी मागे घेतली आणि दलवीर यांची आयसीजेचे न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.
भंडारी आणि ब्रिटनचे उमेदवार क्रिस्टोफर ग्रीनवुड यांच्यात तगडी स्पर्धा होती. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचे स्थायी सदस्य अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे क्रिस्टोफर ग्रीनवुड यांच्या बाजूने उभे राहिले. सुरक्षा परिषदेचा पाचवा स्थायी सदस्य म्हणजे ब्रिटन. अकराव्या फेरीत, भंडारी यांना महासभेच्या दोन तृतीयांश सदस्यांपासून पाठिंबा मिळाला होता, परंतु तरीही ते ग्रीनवुडपेक्षा तीन मतांनी मागे पडले होते. बाराव्या फेरीच्या आधीच ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) या निवडणुकीसाठी भारताचे उमेदवार दलवीर भंडारी यांना रोखण्यासाठी ब्रिटन खालच्या पातळीवर उतरले होते. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमधल्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा वापर ब्रिटनने मतदानाची प्रक्रिया समाप्त करण्यासाठी केल्याचा आरोप होत आहे.