पिंपरी (Pclive7.com):- “राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची कवाडे उघडत गोरगरिबांसाठी स्वतंत्र बोर्डिंगची व्यवस्था त्यांनी केली. शाहू महाराजांचे सामाजिक विचार आजच्या काळातही सदैव मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांनी रुजलेली समता आणि एकात्मता दिशादर्शक आहे. शाहू महाराज खऱ्या अर्थाने समतेचे कैवारी होते.” असे प्रतिपादन माजी नगरसेवक व स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी शिवतेजनगर येथे केले.
स्वामी समर्थ मंदिरात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस प्रा. हरिनारायण शेळके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेष्ठ निवेदक-व्याख्याते राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक पाटील व सौ. क्षमा काळे यांनी संयोजन केले. जेष्ठ नागरिक देव काका व देशपांडे काका यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शेळके व घावटे यांनीही शाहूमहाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. जितेंद्र छाबडा यांनी सूत्रसंचालन केले तर क्षमा काळे यांनी आभारप्रदर्शन केले.