पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर भाजप-शिंदे सरकारसोबत अजित पवार आणि काही आमदार सामील झाले आहेत. यामुळे आता अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेच्या आमदार, खासदारांना राष्ट्रवादी सोबत जुळवून घेण्याची वेळ आली आहे. यावरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी राजकारणात समीकरणे बदलत असतात. राजकारणात काय होईल यावर विचार करण्यापेक्षा समीकरणांसोबत जे लोक आलेत त्यांच्याबरोबर राहून शहराचा विकास साधण्याबाबत मत व्यक्त केले आहे. अजितदादा पवारांसोबत काम करताना अडचण येईल असं वाटत नाही असं ते म्हणाले. ते पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने होते. परंतु, आता सत्तेत राष्ट्रवादीचे नेते आल्यामुळे स्थानिक पातळीवर देखील भाजपाला राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. भोसरी विधानसभा आणि शिरूर लोकसभा लढवण्याबाबत ठाम असलेले आमदार लांडगे यांनी भाजपचे जेष्ठ नेते जे सांगतील तो निर्णय मान्य असेल असे देखील म्हटल आहे.
महेश लांडगे म्हणाले, राजकारणात समीकरण बदलत राहतात. २०१९ ला बघितलं की आमच्यातील घटकपक्ष (ठाकरे गट) आम्हाला सोडून गेला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली. राजकारणात काय होईल यावर विचार करण्यापेक्षा समीकरणांसोबत जे लोक आलेत त्या लोकांबरोबर राहून शहराचा विकास साधावा. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचा आणखी विकास करतील. महाविकास आघाडीतील नेत्यांनी २०१९ च्या आधी एकमेकांवर टीका, आरोप- प्रत्यारोप केले. आता अजित पवार सत्तेत सहभागी झालेत, अजित पवारांसोबत काम करताना अडचण येईल असं वाटत नाही. पुढे ते म्हणाले, शिरूर लोकसभा, भोसरी विधानसभा बाबत भाजपच्या जेष्ठ नेते सांगतील ते मान्य असेल असही ते म्हणाले आहेत.