..तर त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावावी – तुषार कामठे
पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वर्णी लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मात्र प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. अजितदादांना पालकमंत्री पद दिले आहे. परंतु त्यांना अधिकार दिले आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी उपस्थित केला आहे. जर अजितदादांना अधिकार दिले असतील तर त्यांनी गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावावी असे खुले आव्हानच तुषार कामठे यांनी दिले आहे.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. अजितदादांकडे पालकमंत्री पद आल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून या नियुक्तीनंतर प्रश्न उपस्थित करत अनेक आरोप देखील करण्यात आले आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलताना तुषार कामठे म्हणाले की, प्रथमत: अजितदादांना मनापासून शुभेच्छा देतो.. दादांनी जो पदभार घेतलेला आहे, त्याला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. त्या पदाचा अधिकार अजितदादांना गाजवता यायला पाहिजे. या निर्णयानंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या अजितदादा गटामध्ये आनंद आहे, त्याच पद्धतीने महायुतीमध्ये अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या अजितदादांना पालकमंत्री होण्यासाठी दोन अडीच महिन्याचा कालावधी लागला, जो संघर्ष त्यांच्यामध्ये चालू होता, त्यामध्ये आज दादांना यश आले असेल. पण दादांना कितपत अधिकार भाजपच्या वतीने दिला जाईल? याबाबत कामठे यांनी शंका उपस्थित केली आहे.
पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल की अजितदादांना पद दिले की अधिकारही दिले आहेत. गेल्या दोन महिन्याचा शपथविधीचा कालावधी पाहिल्यानंतर दादांना जी खाती दिली आहेत, त्यामध्ये दादांना अधिकार कमी आणि पदाची फक्त गाजरंच दिली आहेत.
जर अजितदादांना अधिकार दिले असतील तर त्यांनी गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी लावल्या पाहिजेत. शहराशी संबंधित असलेले प्रलंबित प्रश्न जसे की साडेबारा टक्के परतावा, अनधिकृत बांधकाम, पवना बंद जलवाहिनी, भामा आसखेड असे प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावले पाहिजे. तेव्हा आमच्या लक्षात येईल की अजितदादांना पद आणि अधिकार हे दोन्ही दिलेले आहेत. परंतु मी आज ठामपणे सांगू इच्छितो की दादांना भाजपा पद देऊ शकते, मात्र अधिकार देणार नाहीत. कारण अजितदादांना अधिकार दिलेत तर भाजपा उघडे पडू शकते म्हणून भाजपा ती रिस्क घेऊ शकत नाही असे कामठे शेवटी म्हणाले.