मुंबई (Pclive7.com):- मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवलं आहे. आगीचं स्वरुप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
गोरेगाव पश्चिममधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजता आग लागली. पाच मजली या इमारतीच्या पार्किंगमध्ये दुसऱ्या स्तरावरील आग लागली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
आगीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत तळमजल्यावरील काही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागल्याने झोपेत आग लागल्याचं उशिरा लक्षात आल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा अधिक असल्याचंही बोललं जात आहे.