पिंपरी (Pclive7.com):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारी पासून सुरु होत आहे. शनिवार कार्तिकी एकादशी तर सोमवार संजीवन समाधी सोहळा आहे. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारला आहे.
आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बहुसंख्येने आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.