पिंपरी (Pclive7.com):- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून पासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज महाराष्ट्रभर विविध प्रकारचे आंदोलन करत आहे. मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देणे, मराठा समाजास कुणबी दाखले देऊन सरसकट ओबीसी प्रवाहातून 50 टक्के च्या आत आरक्षण देणे यासाठी महाराष्ट्र सरकारने 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत मागून घेतली आहे. परंतु महाराष्ट्रभर सरकार याबाबत जलद गतीने काम करताना दिसत नाही सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मुदतीत सोडवावा यासाठी म्हणून जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार गुरुवार दिनांक ७ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.
यावेळी सतीश काळे,वैभव जाधव,मीरा कदम, लहू लांडगे, संपत पाचुंदकर, प्रकाश बाबर, सुनिता शिंदे, माणिक शिंदे, शितल घरत, रावसाहेब गंगाधरे यांनी उपोषण केले.
सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मारुती भापकर, कामगार नेते काशिनाथ नखाते, काशिनाथ जगताप, प्रकाश जाधव, किशोर मोरे, जीवन बोराडे, ब्रह्मानंद जाधव, जयराम नाणेकर, अभिषेक म्हसे, मनोज गरबडे, धनाजी येळकर पाटील, संजय जाधव, संतोष वाघे, गणेश सरकटे, अरविंद जगताप, युवराज दाखले, संपतराव जगताप, गोविंद खामकर या प्रमुख मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक समाजास न्याय मिळावा प्रत्येक समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी जातीनिहाय जनगणना करावी वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करून महाराष्ट्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजास न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तसेच उपस्थितांनी यावेळी केली.