पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील मुंबई बेंगलोर महामार्गापलीकडील भागात वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्याठिकाणी नवीन भाजी मंडई उभारण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूमी आणि नगररचना विभाग तसेच भूमी जिंदगी विभागास निवेदन दिले आहे.
वाकड येथील महामार्गापलीकडील भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामध्ये आणखी वाढ होणारच आहे. यामध्ये भूमकर वस्ती, विनोदे नगर, वाकडकर वस्ती, पारखे वस्ती, भुजबळ वस्ती, ताथवडेचा काही भाग येतो. या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून त्यांना फळे भाज्या आणि इतर गरजेच्या दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी सध्या एकही भाजी मंडई उपलब्ध नाही.
नागरिकांना फळे भाज्या खरेदी करण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या फळ विक्रेत्यांकडून जीव मुठीत धरून खरेदी करावी लागत आहे. महामार्ग आणि इतर रस्त्यांवर फळ विक्रेत्यांकडून सर्रास हातगाडे लावले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अतिक्रमण विरोधी पथक आणि फळविक्रेते यांच्यात यावरून सतत वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
तरी वरील सर्व समस्यांमधून वाकडवासियांची सुटका करून, वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवाशी न खेळता या भागासाठी स्वतंत्र भाजी मंडई उभारण्याची आवश्यकता आहे असेही विशाल वाकडकर यांनी सांगितले.