पिंपरी (Pclive7.com):- तीन वर्षापूर्वी एका गुन्ह्यात दीराला पोलिसांकडे पकडून दिल्याच्या रागातून पतीसह दीर आणि जावेने विवाहितेच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि मृतदेह डोंगरालगत शिवारात पुरला. हा धक्कादायक प्रकार मावळातील चांदखेड येथे मंगळवारी (दि.१६) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडला. या प्रकरणी पती आणि जावेला पोलिसांनी गजाआड केले आहे.
सुनंदा लक्ष्मण चव्हाण (२७, रा. पाचाणे, ता. मावळ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण (रा. पाचाणे, ता. मावळ) यांना अटक केली आहे. दीर गणेश ऊर्फ लहू रामभाऊ चव्हाण हा पसार झाला आहे. मृत महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (२८, रा. केळवडे, ता. भोर, मुळ-वाशिम) यांनी शिरगाव-परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी गणेश हा मृत महिलेचा दीर आहे. सुनंदा आणि लक्ष्मण यांचे बारा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. तीन वर्षापूर्वी लोणीकंद येथील एका गुन्ह्यात मृत सुनंदा यांनी दीर गणेश याला पोलिसांकडे पकडून दिले होते. त्या वेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. याचा आरोपींना राग होता. याच रागातून आरोपींनी सुनंदा यांचा खून करण्याचा कट रचला. १६ जानेवारी रोजी सकाळी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह त्यांनी चांदखेड ग्रेथील डोंगरालगत असणाऱ्या शिवारातील झाडींमध्ये जमिनीत पुरला. दरम्यान, बहिणीचा फोन लागत नाही, तसेच ती घरी नाही म्हणून सुनंदा यांच्या माहेरच्या लोकांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. फौजदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.