पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारणीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष सेना राहिल असा विश्वास शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागिय संपर्क नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेने हा निर्णय अतिशय घाईत घेतला असून यामुळे शिवसेनेची वाईट अवस्था होईल, असे मत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. याबाबत विचारले असता कोण काकडे ? त्यांनी डोकं तपासून घ्यावे असा टोला खासदार राऊत यांनी लगावा आहे.
चिंचवडमध्ये खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. भाजपसोबत २५ वर्ष युती होती. भाजपने २०१४ मध्ये स्वत:हून युती तोडली आहे. आम्ही तोडली नाही. केवळ महाराष्ट्र अस्थिर होऊ नये म्हणून शिवसेना सत्तेत आहे. स्वतंत्र लढल्यास शिवसेनेची अवस्था वाईट होईल, असे विधान भाजप सहयोगी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी केले होते. काकडे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत राऊत म्हणाले, “शिवसेनेची वाईट अवस्था होईल म्हणणा-यांचे डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी डोके तपासून घ्यावे. पुण्यात चांगले डॉक्टर आहेत. नसेल तर आमच्याकडेही डॉक्टर आहेत. ते त्यांचे डोकं तपासतील, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचे नव्हे, त्यांचे नुकसान होईल, असे ते कदाचित बोलत असतील असेही राऊत म्हणाले.
२५ वर्षांची युती भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्येच तोडली. २०१९ चे रणशिंग आम्ही फुंकले असून २०१४ चे वातावरण २०१९ मध्ये असणार नाही. शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यामुळे भाजपच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनाच एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला.