पिंपरी (Pclive7.com):- वृध्दावस्था ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, या अवस्थेत विविध रोगांचा सामना करावा लागतो. तो करताना आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य आहार, नियमित व्यायाम आणि काही पथ्ये पाळली तर जास्तीत जास्त निरोगी राहण्याचा आनंद घेता येऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. वैशाली राजहंस यांनी केले. पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत त्या बोलत होत्या.
पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोडवरील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर रविवार दि. ३१ रोजी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत डॉ. वैशाली राजहंस यांनी वृध्दापकाळातील समस्या, आजार आणि आहार याविषयी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. या बैठकीच्या निमित्ताने ज्येष्ठांना वाढदिवसानिमित्त तसेच ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशा दांपत्यांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन शकुंतला शिंदे यांनी केले, तर सखाराम ढाकणे यांनी आभार मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुभाष पवार, रमेश सांडगे, राजेंद्र देशमुख या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.