पिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दलित मते भाजपकडे वळली असून २०१९ च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सेनेला कॅबिनेट मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपच्या नेत्यांनी दूर करावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय राज्यात २ जागांवर निवडणूक लढणार असून विधानसभेसाठी एका जिल्ह्यात १ ते २ जागा देण्यासाठी प्रयत्न करणार असून किमान ४० जागा लढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे वतीने पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.
निरव मोदीचा भ्रष्टाचार मोठा आहे. त्याला पकडून लवकरात लवकर जेलमध्ये पाठविण्यात येईल. बँकांची देखील चौकशी होणार आहे असे सांगत आठवले पुढे म्हणाले, “भीमा कोरेगाव मध्ये आता शांतता आहे. दलित आणि मराठ्यांमध्ये एकता हवी आहे. दोन्ही समाजांची एकत्र येण्याची भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुलाखतीत आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे असे म्हणाले होते. परंतु, दलितांना जातीच्याच आधारावर आरक्षण द्यावे जोपर्यंत जाती जात नाहीत तोपर्यंत आरक्षण जाणार नाही. पवार यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले होते ‘मराठ्यांना आरक्षण देताना आर्थिक निकष सर्वांना आर्थिक निकष नाही’
२०१४ ला महाराष्ट्रातून काँग्रेसला घालवण्याची प्रबळ इच्छा होती. २०१९ ला काँग्रेसला येऊ न देण्याची प्रबळ इच्छा आहे. आगामी निवडणुकीत भाजपला राजस्थान सारख्या काही राज्यात थोडा फटका बसू शकतो असे सांगत आठवले म्हणाले, “शिवसेनेला चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांची नाराजी असू शकते. शिवसेनेला एखादे कॅबिनेट पद मिळावे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. नारायण राणे माझ्या पक्षात आले तर चांगली गोष्ट झाली असती. त्यांना मीच सल्ला दिला की काँग्रेसमधून माझ्याकडे या किंवा भाजपकडे जा, पण त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला.”
वढुबुद्रुकच्या प्रकरणानंतर मी गावाला भेट दिली आहे. सर्व मिटल्याचे मला समजले. मराठा समाजाने सहकार्य केले. त्याबद्दल मराठा समाजाचे आभार. ज्याच्या विरोधात पुरावे सापडतील त्याला तात्काळ पकडावे, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असे आठवले म्हणाले.
स्थानिक पुढारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. आम्ही कुणीतरी मान द्यावा म्हणून लढत नाही. वेळ आल्यानंतर यांनाही मान मिळेल. समाजामध्ये दलित आणि मराठा एकत्रितपणे नांदण्यासाठी ही सामाजिक सलोखा परिषद घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.