मुंबई (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीची २ पत्रे आली आहेत. राज्याच्या गृहविभागाने ही माहिती दिली आहे. या पत्रांमध्ये गडचिरोलीच्या चकमकीचा उल्लेख असल्याचे गृहखात्याने स्पष्ट केले आहे.
नक्षलवादी संघटनेकडून ही २ पत्रे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावण्यात आले आहे. दोन्ही पत्रांमध्ये गडचिरोलीतील नक्षलविरोधी चकमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रांबाबत पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली आहे.
– पत्रास कारण गडचिरोलीची ही चकमक –
गडचिरोली जिल्ह्याच्या ऐटापल्लीच्या ताडगाव-कसनूर, बोरिया जंगलात सुरक्षादलाने नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. २२ एप्रिल रोजी सी-६० पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती. बोरिया जंगलात १६ नक्षल्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळाजवळ इंद्रावती नदीमध्ये आणखी ११ मृतदेह सापडले होते. तसेच राजाराम खांदला परिसरातील चकमकीतही ६ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते अन्य एका कारवाईमध्ये १ नक्षलवादी ठार करण्यात आला होता. अशा प्रकारे एकूण ३४ नक्षलवादी ठार करण्यात आले होते. त्याच चकमकीचा या धमकी पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.