पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील एंट्री निश्चित केली आहे. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे पार्थ पवार यांचा मावळमधून पत्ता कट झाला असून सुरू असलेल्या चर्चांना आता एकप्रकारे पूर्ण विराम मिळाला आहे.
पुणे एमआयटी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोरच्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार बोलत होते. रोहित पवार आणि पार्थ पवार यांनाही यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे पवार कुटंबातून एकाच वेळी चार जण निवडणूक लढणार का, असंही बोललं जात होतं. पण पवार कुटुंबातून मीच निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मावळ मतदारसंघात पार्थ यांच्या फेऱ्या वाढल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीने केलेल्या कामांचा पार्थ यांनी आढावा घेतला होता. तसेच मोरया गोसावी गणपतींचे दर्शन घेऊन शहरातील नेत्यांच्या भेटीगाठींवर जोर दिला होता. पार्थ यांचा मतदारसंघातील वाढता वावर यामुळे मावळमधून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र आज स्वत: शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पार्थ यांचे मावळचे तिकीट कट झाले असल्याचे बोलले जात आहे.