पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबर तसेच नाल्यांमध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होईल. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराची स्मार्ट सिटी, पेन सिटी आणि आता मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण होत अाहे. पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, मात्र नेहमीच येतो पावसाळा या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवरून सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक पावसाळ्यात दिसून येते. परिसरातील नाल्यांची कँक्रिटीकरण झाले असले तरी नाल्यांमध्ये ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरला नसलेली झाकणे तसेच काही ठिकाणी टाकलेल्या मातीचा भराव यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाल्यात कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होत आहे. नाल्यात अधिक प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा देखील होत नाही. तसेच या नाल्यात सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे येथे पाणी साचून दुर्गंधी पसरून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्वरित रहाटणी पिंपळे सौदागर मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.